You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution

Add a Review

भगवद्गीता - निवडक श्लोकांचे सार

किशोर कुलकर्णी
Type: Print Book
Genre: Religion & Spirituality
Language: Marathi
Price: ₹250 + shipping
Price: ₹250 + shipping
Dispatched in 5-7 business days.
Shipping Time Extra

Description

हे पुस्तक म्हणजे लेखकाला गीतेतील तत्त्वज्ञान जसे समजले व भावले त्याचे व्यावहारिक सार आहे. गीतेत मांडलेले तत्त्वज्ञान हे कोणालाही आणि जीवनातील कोणत्याही परिस्थितीत कसे वागावे याबाबतीत उत्तम मार्गदर्शन करू शकते. अर्थात, गीतेतील सर्व कांही सर्वांनाच नेहमीच लागू होईल असे नाही. पण कोणीही प्राप्त परिस्थितीत त्याला उपयोगी असे तत्त्वज्ञान गीतेतून नक्कीच मिळवू शकतो. निरनिराळ्या स्वभावांच्या व्यक्तींना योग्य असे वेगवेगळे आध्यात्मिक मार्ग गीतेत प्रतिपादलेले आहेत. गीतेचे एक शक्तिस्थान हे की सामुदायिक धर्म या संकल्पनेला त्यात अजिबात स्थान नाही, म्हणजे पुण्य व पाप आणि त्यानुसार मरणोत्तर स्वर्गात किंवा नरकात जावे लागणे यासारख्या कल्पनांना त्यात महत्त्व नाही. सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज । अहंत्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच: ॥ गीता १८:६६). त्याऐवजी, गीतेचा केंद्रबिंदु व्यक्तिगत स्वधर्म या संकल्पनेवर आहे, ज्याच्या द्वारे मनुष्य सच्चिदानंदरूप होऊन मुक्त होतो. स्वधर्मात काय करावे आणि काय करू नये याबाबत कोणत्याही प्रकारचे नियम नाहीत. तर स्वधर्म म्हणजे प्रत्येक व्यक्तीने त्याच्या स्वभावानुसार, परिस्थितिनुसार, बुद्धिशक्तिनुसार जे कर्म योग्य वाटेल, ते ईश्वरानुसंधानात राहून करणे. याच नाण्याची दुसरी बाजू ही की इतरांशी तुलना न करणे व आपल्या वाट्याला जे येईल ते सुखाने भोगणे. तसेच, भविष्यात काय होईल याची चिंता न करता, केवळ वर्तमानात कर्म करत राहावे. दुसर्याा शब्दात, स्वधर्मात कर्म कोणते योग्य किंवा अयोग्य यापेक्षा ते करतांना ठेवण्याची वृत्ति महत्त्वाची. म्हणूनच गीतेतील "कर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्मा संग: अस्तु अकर्मणि॥" (गीता २:४७) हा संदेश मध्यवर्ति आहे व तो सुवर्णाक्षरात लिहून सतत व सहज दिसेल अशा जागी घरात व कार्यालयात लावण्याच्या योग्यतेचा आहे. याचा अर्थ असा की फक्त कर्म करणे आपल्या हाती आहे, कर्माच्या फळावर आपला कोणताही अधिकार नसतो. तसेच, फळावर नजर ठेवून कर्म करू नये आणि कर्म न करण्याची इच्छा पण असू नये (कर्म सोडू नये). गीतेमध्ये कर्मकांडाला अजिबात महत्त्व दिलेले नाही. देवाची पूजा किंवा भक्ति करण्याची कोणतीही विशिष्ट पद्धत किंवा त्यासाठी वापरण्याचे साहित्य याला कांहीच महत्त्व नसून आपला भाव महत्त्वाचा, असे श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात (पत्रं पुष्पं फलं तोयं य: मे भक्त्या प्रयच्छति। तदहं भक्त्युमपहृतमश्नामि प्रयतात्मन:॥ गीता ९:२६). यामुळेच गीतेचे तत्त्वज्ञान धर्मातीत आहे.

गीतेतील शेवटचा श्लोक (यत्र योगेश्वरकृष्ण: यत्र पार्थोधनुर्धर: । तत्र श्रीर्विजयो भूतिर्धृवा नीतिर्मतिर्मम॥ गीता १८:७८) हा पूर्णोद्गार समजला जातो. यात गीतेच्या सर्व तत्त्वज्ञानाचे सार आहे असे सांगितले जाते. या श्लोकाचा मथितार्थ असा की श्रीकृष्ण हा भगवंतांचा पूर्णावतार असल्यामुळे, त्यांनी गीतारूपाने अर्जुनाला गुरूपदेश दिल्यानंतर, अर्जुन सुद्धा भगवत्स्वरूप होऊन गेला. याच्या परिणामस्वरूप, पांडवांचा दोन प्रकारे फायदा झाला - श्रीकृष्ण व अर्जुन दोघे ही भगवत्स्वरूप असून युद्धात त्यांच्या बाजूने होते आणि म्हणून त्यांचा विजय निश्चित होता. आपणा सर्वसामान्य भक्तांच्या दृष्टीने याचा अर्थ असा की जर आपल्यावर सद्गुरुकृपा झाली, तर आपण सुद्धा ऐहिक जीवनाच्या लढाईत विजयी होऊ, ऐहिक अर्थाने नव्हे, तर आध्यात्मिक अर्थाने. जीवनाच्या टक्क्याटोणप्यातून आपण सुखरूप बाहेर निघू.

बर्यापच तत्त्वज्ञानांमध्ये एक गूढ संकलपना समजाविण्यासाठी दुसर्याम तितक्याच गूढ संकल्पनेचा उपयोग केला जातो आणि त्याच्या परिणामस्वरूप तत्त्वज्ञान पुस्तकी राहाते, त्याचा व्यावहारिक उपयोग काय हे बहुतेक लोकांना कळत नाही! म्हणून, या पुस्तकात लेखकाने संकल्पना अशा पद्धतीने मांडल्या आहेत की त्यांचा व्यवहारात आणि प्रत्यक्ष सामान्य ऐहिक जीवनात कशा पद्धतीने उपयोग करता येईल ते स्पष्ट व्हावे. लेखकाचे असे स्पष्ट आकलन आहे की जीवन जसे चालते तसे ते चालणारच, कधी कडू तर कधी गोड अनुभव येतच राहाणार. पण त्यांच्याकडे पहाण्याचा आपला दृष्टिकोण योग्य असला की जीवन सुसह्य होते. आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा जीवनात उपयोग हा योग्य मानसिक दृष्टिकोण बाणविण्यासाठी व्हायला हवा.

श्री ज्ञानेश्वरीच्या (म्हणजे संत ज्ञानेश्वर माउलींच्या श्रीमद्भगवद्गीतेवरील निरुपणाच्या) माझ्या अभ्यासातून मला झालेला व्यावहारिक बोध गीतेतील कांही निवडक श्लोकांच्या संदर्भात या पुस्तकात सादर केला आहे. गीतेत पुष्कळ तत्त्वे पुन्हा पुन्हा मांडलेली आहेत. शिवाय, कांही अध्याय निखळ तत्त्वज्ञानाच्या प्रांतात मोडतात. परंतु, मुळात गीता हा व्यावहारिक ग्रंथ आहे, ज्याचा उपयोग दैनंदिन जीवन आध्यात्मिक दृष्टिकोण बाळगून शांतपणे जगण्यासाठी आहे. त्या दृष्टीने ज्यांचा थेट उपयोग होईल असे कांही श्लोक मी या पुस्तकासाठी निवडले आहेत. अर्थात, माझ्या मते अध्यात्माचा व्यावहारिक उपयोग हा आपली मानसिकता योग्य असणे हाच असतो. शेवटी अध्यात्म म्हणजे आपण बाह्य जगात काय करतो यापेक्षा सर्वसाधारण प्रापंचिक म्हणून जीवन व्यतीत करतांना आपली मनोवृत्ति जर योग्य असेल, तर जीवन शांतपणे जगता येते. तेव्हां माझ्या या प्रयत्नाकडे त्या दृष्टीने पहावे.

या पुस्तकाची मांडणी प्रथम मूळ गीतेतील श्लोक, एक किंवा साराच्या दृष्टीने एकापेक्षा अधिक एक गट म्हणून, नंतर श्लोकांचा शब्दश: अर्थ व मग त्या श्लोकांतून मला झालेला व्यावहारिक बोध अशी आहे.

About the Author

लेखक एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबात एका छोट्या शहरात जन्मला व वाढला. परंपरागत रूढी व धर्माचरण यानुसार जीवन जगणारे कुटुंब व त्यामुळे एक प्रकारे देवभीरु स्वभाव नैसर्गिकपणॆच बनलेला. पण पुढे अभियांत्रिकी पदवीसाठी मुंबईतील एक प्रथितयश संस्थेत पांच वर्षे वसतिगृहात राहाणे व नंतर नोकरीनिमित्त निरनिराळ्या शहरात व अठरापगड जातीधर्मांच्या व पार्श्वभूमीच्या लोकांमध्ये वावरल्यामुळे व्यक्तिमत्त्वात बदल होत गेला. पूर्वीचा धार्मिक व देवभीरु स्वभाव कमी होऊन, अधिकाधिक शास्त्रीय व तार्किक दृष्टिकोण बनला.

पुढे एकदा सिंगापूरमध्ये कामनिमित्त तीन महिने वास्तव्य करावे लागले. लेखकचा भाऊ तिथेच स्थायिक असल्याने त्याच्या घरीच राहणॆ झाले. त्यादरम्यान भावाच्या गुरूंची योगायोगाने भेट घडून आली आणि तेव्हांपासून अध्यात्मात रस वाढू लागला. मग नोकरी लवकरच, म्हणाजे वयाच्या ५३ व्या वर्षीच सोडून अध्यात्माची कास धरली. ज्ञानेश्वरीचे अनेकवार वाचन व मनन झाले. ज्ञानेश्वरीचे इंग्रजीत भाषांतर करून ते ब्लॉगच्या स्वरूपात "स्पीकिंग ट्री" या टाइम्स ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर पोस्ट केले. तसेच त्याच साइटवर इतर आध्यात्मिक चिंतनाच्या स्वरूपातील कित्येक ब्लॉग पण पोस्ट केले. टाइम्स ऑफ इंडियाच्या दैनिकात संपादकीय पानावर "स्पीकिंग ट्री" नांवाच्या आध्यात्मिक कॉलममध्ये वीसच्या वर लेख सुद्धा छापून आले. मग लेखकाने त्याच्या आध्यात्मिक चिंतनाच्या ब्लॉगचे पुस्तकरूपाने स्वप्रकाशन केले. तसेच ज्ञानेश्वरीचे इंग्रजी भाषांतर सुद्धा स्वप्रकाशित केले. गीतेचे ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जे मनन चिंतन झाले, त्या आधारावर लेखकाला समजलेले गीतेचे सार प्रथम इंग्रजीतून स्वप्रकाशित केले. त्यानंतर त्याचेच मराठी प्रकाशन हे प्रस्तुतचे पुस्तक.

लेखकाला त्याच्या सद्गुरूंकडून रीतसर शक्तिपाताची दीक्षा लाभलेली आहे आणि सद्गुरु कृपेनेचे अध्यात्ममार्गावर वाटचाल सुरु आहे.

Book Details

Publisher: Kishor Kulkarni
Number of Pages: 189
Dimensions: 6"x9"
Interior Pages: B&W
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)

Ratings & Reviews

भगवद्गीता - निवडक श्लोकांचे सार

भगवद्गीता - निवडक श्लोकांचे सार

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book भगवद्गीता - निवडक श्लोकांचे सार.

Other Books in Religion & Spirituality

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.